दिनांक १६/०१/२०१५
मुलं आज उत्साहात होती.
काल सुट्टी असल्याने आज त्यांना आपल्या
सरांना तिळगूळ द्यायचे होते.
मी वर्गात येताच सगळे माझ्याभोवती गोळा
झाले.
“सर, माझे तिळगूळ घ्या.” सगळ्यांनी एकच गलका केला.
हे अपेक्षितच होतं.
मी मात्र त्यांना अनपेक्षित धक्का दिला.
"तुमचे तिळगूळ मी घेणार
नाही."
.
मुलं एकदम अवाक्..
.
“का सर?”
एकदोघांनी धीटपणे विचारलं.
.
"तुम्ही तिळगूळ देताना
'तिळगूळ घ्या गोड बोला' असं म्हणणारच. मग मला तुमच्याशी वर्षभर रोजच गोड
बोलावं लागेल. पण एखाद्या दिवशी तुमच्याशी थोडं का होईना कठोर
बोलण्याची वेळ येईल, तेव्हा माझी अडचण होईल ना?"
.
मुलं एकदम शांत. काय करावं त्यांना कळेना.
.
“त्यापेक्षा असं करा.” मार्ग सुचवत मी बोललो. “मला ‘तिळगूळ घ्या’ एवढंच म्हणा; किंवा ‘गोड बोला’ असं म्हणणार असाल तर सरांना
कठोर बोलण्याची वेळ येऊ देणार नाही ही जबाबदारी घ्या. आपण दुपारच्या सुट्टीनंतरच तिळगूळ
वाटपाचा कार्यक्रम घेऊ. तोपर्यंत ठरवा तुम्ही.”
.
इवलेसे चेहरे घेऊन मुलं जागेवर गेली.
.
दुपारच्या सुट्टीत त्यांच्यात काय खलबते
झाली कुणास ठावूक.
वर्गात आल्यावर पुन्हा माझ्याभोवती गोळा
होत म्हणाली, “सर, आमचं ठरलं.”
.
“काय ठरलं?” मी विचारलं.
.
“आम्ही तिळगूळ घ्या गोड बोला असंच म्हणणार.”
.
.
येणारे थोडे दिवस का होईना, मला कठोर बोलावं लागणार
नाही याची खात्री मला त्यांच्या डोळ्यांत दिसत होती.
- विक्रम वागरे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा